Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाला कधी होणार सुरुवात? हवामान विभागाकडून फक्त ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..
राज्यात पावसाचा जोर ओसरला असून अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही. दरम्यान, पुढील चार दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, आणि गोंदिया या चार जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला गेला नाही. (Maharashtra Rain)
राज्यातील कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. या महिन्यात अनेक ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडली. मुंबईसह कोकण आणि विदभार्तील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपले होते. दरम्यान, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. काही मोजक्या ठिकाणी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पावसाची गरज आहे.
रविवारी (दि . 6) सायंकाळपर्यंत कोकण भागातील मुंबईत 0.2 मि.मी., सांताक्रूझ 2, रत्नागिरी 2, तर डहाणूमध्ये 0.3 मि.मी.पाऊस बरसला. मध्य महाराष्ट्रातील लोहगावमध्ये 0.2 मि.मी. जळगाव 4, कोल्हापूर 1, महाबळेश्वर 20, नाशिक 1, सांगली 2, सातारा 0.6, तर सोलापूरमध्ये 0.1 मि.मी. पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगरमध्ये 0.7 मि.मी.पाऊस पडला. विदर्भातील अकोलामध्ये 2, बुलढाणा 2, गोंदिया 6, वाशिम 2, तर यवतमाळमध्ये 1 मि.मी. पाऊस नोंदविला आहे.
घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे. लोणावळा 1, शिरगाव 5.6, शिरोटा 1.4, ठाकूरवाडी 1, वळवण 1.1, वाणगाव 1.3, अम्बाण 5.4, भिवपुरी 0.3, दावडी 5.5, डुंगरवाडी 3.5, कोयना 2.3, खोपोली 1.1, खंद 0.4, ताम्हिणी 3, भिरा 2.1 तर धारावीत 0.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पुढील 7 ते 10 ऑगस्टदरम्यान, कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा बारा वाहण्याची शक्यता आहे . मध्य महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.