नाशिक : देशांतर्गत कांद्याची आवक वाढली असताना भाव कोसळले यामुळे निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेटा वाढत असतानाच सोमवारी (ता. २८) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ पासून निर्यातीला सुरवात होईल.

नाशिक जिल्ह्यात कांद्याचा किलोचा भाव ४० रुपयांपर्यंत पोचला असताना केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर साडेतीन महिन्यांत निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. या मुळे खरीप आणि लेट खरीप (लाल पोळ) कांद्याचा भाव वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे .

भारताने कांद्यावरील निर्यातबंदी उठविताच, निर्यातदारांकडे अरब राष्ट्रे, श्रीलंका, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, फिलिपीन्समधील आयातदारांनी कांद्याची मागणी नोंदविण्यास सुरवात केली आहे.

सद्यःस्थितीत महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे.फेब्रुवारीमध्ये नव्याने कांदा दाखल होत असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये यंदा २० टक्क्यांनी कांद्याचे उत्पादन वाढणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने निर्यात खुली करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत शेतकरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *