कांद्याच्या दरांत मोठी घसरण, तर कापूस, सोयाबीन अजूनही घरातच..! शेतकरी मेटाकुटीला, पहा आजचे बाजारभाव..
राज्यांतील कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काल प्रति क्विंटलामागे तब्बल सहाशे रुपयांनी दर खालावले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून लागवडीवर झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
काल (गुरुवारी) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल 468 गाड्यातून 46 हजार 800 क्विंटल कांद्याची आवक झाली. ही आवक सोलापूर जिल्ह्यासह विजापूर, गुलबर्गा, बिदर, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, जळगाव, लासलगाव अहमदनगर, राहुरी या परिसरातून झाली.
मागील आठवड्यात सोलापूर बाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तरी देखील दर प्रतिक्विंटल 100 रुपये ते 2200 रुपयांपर्यंत स्थिर होते. एक हजाराहून अधिक ट्रक्समधून कांद्याचे आवक होऊन देखील दर स्थिर होते. आता आवक निम्म्यापेक्षा घटली आहे.
आजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
दरात होत असलेली घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरली आहे. काल ( गुरुवारी ) दर प्रतिक्विंटला मागे सहाशे रुपयांनी घसरले. सरासरी 900 रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. लागवडीवरील खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.
कापसालाही भाव नाही, नुकसानीचे अनुदानही मिळेना, शेतकरी गोत्यात..
अतिवृष्टी व परतीच्या पावसाचा खरीप पिकांना फटका बसल्याने अपेक्षित प्रमाणात उत्पादन आले नाही. जे उत्पादन निघाले, त्यास बाजारपेठेत समाधानकारक भाव नाही. सध्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची मोठी गोची झाली आहे. भाव घसल्याने माल घरात पडून आहे. दुसरीकडे नुकसानीचे अनुदानही आणखी पदरी पडलेले नाही.
एंकदरीत शेतकरी चोहोबाजूने अडचणीत आले आहेत. हे चित्र फक्त औरंगाबाद जिल्ह्यात नव्हे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर दिसून येत आहे. गतवर्षी कापूस, सोयाबीनला उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदाही त्याच आशेने शेतमाल विक्री न करता घरी साठवून ठेवला आहे. सध्या कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
आजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कापूस, सोयाबीन, तूर, मका या नगदी पिकांच्या विक्रीवर अवलंबून असते. कापूस विक्री करता येईना परिणामी हातात पैसा नाही. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. डोक्याला हात लावून बसण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
नगदी पैसे नसल्याने बाजारात ग्राहकी मंदावली आहे. मकरसंक्रातीलाही जेमतेम ग्राहकी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोन्याच्या दुकानांतही पहिल्यासारखी वर्दळ दिसेना.
आजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
रब्बी हंगामातील पिकांवर फवारणीसाठी ठराविक किटकनाशके आणि खते घेण्यासाठी शेतकरी आवश्यक शेतमालाची विक्री करीत आहेत. लग्नसमारंभही लांबण्याच्या मार्गावर आहेत. चाळीसगावच्या एका फर्निचर व्यापाऱ्यांनी सांगितले की, या दिवसांत फर्निचर घेण्यासाठी वर – वधू पक्षाची लगीनघाई असते परंतू भाव घसरल्याने शेतमाल विक्री शेतकऱ्यांनी थांबवली आहे, त्यांच्याकडे सध्या पैसा नाही याचा फटका फर्निचर व्यापाऱ्यांनाही बसत आहे.
दोन ते तीन महीने होवून अजुनही अनुदान आणि पिकविमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली असल्याचे प्रगतशील शेतकरी भोला महाजन म्हणाले.