ठाणे – कल्याण – डोंबिवली – भिवंडी – नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या कल्याण – तळोजा मेट्रो 12 मार्गाच्या निविदा जाहीर झाल्या आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. शिंदे म्हणाले, या प्रकल्पाचा फायदा केवळ कल्याण आणि डोंबिवलीलाच होणार नाही, तर इतर भागांनाही अखंड कनेक्टिव्हिटीही मिळणार आहे.
नवी मुंबई आणि मुंबई मेट्रो 12 प्रोजेक्टमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी आणि मुंबई येथील रहिवाशांचे जीवन सुधारेल आणि इतर मेट्रो मार्गांसोबत जोडले जाणारे नेटवर्क तयार होईल. हा मार्ग कासारवडवली – वडाळा मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रोला जोडला जाणार असून व्यापक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. MMRDA महामार्गापर्यंत पोहोचण्याचा वेग वाढवण्यासाठी रोड लूप तयार करण्याचा विचार करत आहे..
कल्याण, डोंबिवली, तळोजा आणि नवी मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रोला जोडण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अँथॉरिटीने (MMRDA) मेट्रो 12 कॉरिडॉरला नवी मुंबई मेट्रोशी जोडण्यासाठी मेट्रो 12 च्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मेट्रो मार्ग जोडण्यासाठी, मेट्रो 12 च्या मार्गात सुमारे 700 मीटर अंतर अधिक जोडले जाणार आहे. मेट्रो मार्गाचा विस्तार करून, MMRDA तळोजाजवळील मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रोला जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे. कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो 12 कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे, तर नवी मुंबईतील बेलापूर ते पेंढार दरम्यान मेट्रो कॉरिडॉर बांधण्यात आला आहे..
20.75 किमी लांबीसाठी 5,865 कोटींचा खर्च..
अंदाजे 20.75 किमी लांबीच्या मेट्रो 12 कॉरिडॉरची पायाभरणी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सुमारे 5,865 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड मेट्रो कॉरिडॉरच्या उभारणीसाठी अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते, परंतु मेट्रो 12 ते नवी मुंबई मेट्रोला जोडण्यासाठी डिझाइनमध्ये बदल केल्यामुळे एमएमआरडीएला निविदा रद्द करावी लागली होती. परंतु आता नवीन डिझाइनसह नवीन निविदा जरी झाली आहे.
कल्याण ते मुंबईपर्यंतचा प्रवास होणार सुपरफास्ट..
सध्या कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या संकुलात राहणारे नागरिक रस्ते किंवा लोकलने नवी मुंबईत ये – जा करतात. रस्त्याने हा प्रवास पूर्ण करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तसेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी लोकांना ठाण्यात यावे लागते आणि पुन्हा लोकल ट्रेनने नवी मुंबई गाठावी लागते. दोन्ही मेट्रो मार्ग जोडल्यास तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
त्याचबरोबर ठाणे – भिवंडी-कल्याण दरम्यान बांधल्या जाणाऱ्या मेट्रो 5 कॉरिडॉरलाही मेट्रो 12 जोडण्यात येणार आहे. अशा प्रकारे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, तळोजा, बेलापूर आणि नवी मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेदनादायी प्रवास भविष्यात सुखकर होणार आहे..
कल्याण पूर्वेपासून ते तळोजापर्यंत 17 स्टेशन्स..
गणेश नगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली MIDC, सागांव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निकाळजे गाव, वडवली, बाळे, वाकलण, तुर्भे, पिसर्वे डेपो, पिसर्वे, तळोजा येथे 17 स्टेशन्स बांधण्याचे नियोजन आहे.