ब्रेकिंग : देशावर ओमिक्रॉनचं संकट ! 4 राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह ; लखनऊ एयरपोर्टवरून 125 प्रवासी बेपत्ता…
शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. ओमिक्रॉनने भारतातही चिंता वाढवली आहे. दरम्यान, उच्च जोखीम असलेल्या देशांतील सुमारे 30 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
एकूण चार राज्यांमध्ये या 30 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या प्रवाशांचे स्वॅब नमुने पुढील चाचणीसाठी आरोग्य मंत्रालयाने मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. या तपासणीत या प्रवाशांपैकी कुणाला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे की नाही ? हे उघड होणार आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे की, यातील बहुतेक प्रवासी उच्च जोखमीच्या आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करून परतले आहेत. यापैकी 9 प्रवासी हे राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहेत. याशिवाय तामिळनाडूतील 2 आणि गुजरातमधील 1 प्रवाशांचा समावेश आहे.
बंगळुरूमध्ये आढळला पहिला रुग्ण :-
कर्नाटकातील बेंगळुरू शहरात गुरुवारी ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यापैकी एक प्रवासी 27 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून दुबईला गेला होता आणि त्याने या संदर्भात स्थानिक प्राधिकरणाला माहितीही दिली नव्हती. या प्रकाराची लागण झालेली दुसरी व्यक्ती डॉक्टर आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या संपर्क ट्रॅकिंगवर काम केले जात आहे.
महाराष्ट्रातील 28 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले :-
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपो म्हणाले की, 28 जणांचे स्वॅबचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्वजण गेल्या महिनाभरात उच्च जोखमीच्या देशांतून आले होते. त्यापैकी 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ‘आम्ही सध्या त्यांना ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे का याचा तपास करत आहोत.’ 10 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान विविध देशांतून 2,868 प्रवासी राज्यात आले. यापैकी 485 जणांची चौकशी करण्यात आली आहे.
यूपीमध्ये 9 विदेशी कोरोना पॉझिटिव्ह ; तर 125 प्रवासी गायब :-
उत्तर प्रदेश सरकारकडून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एकूण 9 परदेशी नागरिकांची नोंद झाली आहे. यामध्ये एका 13 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हे सर्वजण मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथील आश्रमात गेले होते. त्यापैकी तिघे भारत सोडून गेले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. बाकीचे सध्या वृंदावन आश्रमात क्वारंटाईनमध्ये आहेत.
हे सर्वजण नोव्हेंबरच्या मध्यात भारतात पोहोचले होते. उत्तर प्रदेशचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद वर्धन यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 125 प्रवासी उतरले पण सध्या त्यांचा मोबाईल बंद असल्याचं आढळून आलं आहे. सध्या प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरु आहे.