शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : मागील दोन दिवसांपासून राज्यासह शिर्डीत कोसळत असलेला पाऊस आणि जाणवत असलेलया कडाक्याच्या थंडीमुळे स्त्याच्या कडेला दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावर एक आणि कणकुरी रोडवर लागत असलेल्या ओढ्याजवळ एक अशा दोन ठिकाणी दोन व्यक्तीचे मृतदेह आढळल्याची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले.
एका मृतदेहाजवळ काही आधार कार्ड व दवाखान्याची काही कागदपत्रे आढळली असून त्यावरून एकनाथ हाटे (रा. कल्याण), अशी एकाची ओळख पटली आहे. तर दुसरा व्यक्ती हा शिर्डीत भिक्षेकरू असल्याचा अंदाज लावला आहे.
मागील दोन दिवसांपासून शिर्डीत थंडी आणि रिमझीम पाऊस सुसू असल्याने शिर्डीतील भिक्षेकरुंना निवारा नसल्याने ते थंडीत गारठून जात आहेत. दरम्यान, पाऊस आणि गारठ्यामुळे दगावलेल्या शेळ्या-मेंढ्यांची संख्या दीड हजारांवर गेल्याचे सांगण्यात येते. सध्या पाऊस थांबला असला तरी हवामान ढगाळ आणि हवेत गारठा कायम आहे.