सोयाबीन दरवाढीची आशा आता धूसर झालीच आहे. दिवसागणिस घसरत असलेल्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून दर घटत असतानादेखील गुरुवारी 13 हजार 749 क्विंटलची आवक झाली होती. उत्पादनात घट झाल्यानंतर सोयाबीनला सरासरी तरी दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, दिवाळीनंतर दराला लागलेली उतरती कळा अद्यापही कायम आहे.
तेलबियांची आयात आणि सरकारची धोरणे याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर होत आहे. सोयाबीन काढणी होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर दिला होता. दिवाळीनंतर दरात सुधारणा होईल असा अंदाज वर्तवला जात होता.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तर सोयाबीन थप्पीला लावलेच पण व्यापाऱ्यांनीही खरेदी केलेल्या सोयाबीनची साठवणूक केली आहे. त्यामुळे घटत्या दरामुळे केवळ शेतकरीच त्रस्त नाहीतर व्यापारीही अडचणीत आले आहेत.
लातूर ही मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी धाराशिव बीड, सोलापूर, कर्नाटक येथून आवक सुरू असते. दरवर्षी हंगाम सुरु होताच 60 ते 70 हजार क्विंटलची आवक दिवसाला होत असते.
यंदा मात्र, बाजारपेठेत शुकशुकाट कायम आहे. बुधवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल 4 हजार 570 रुपये दर मिळाला होता. गुरुवारी 4 हजार 350 दर मिळाला आहे. त्यामुळे मिळेल तो दर पदरात पाडून घ्यावा या उद्देशाने घट झाली असतानाही 13 हजार 749 क्विंटलची आवक झाली होती. तुरीला 10 हजार प्रतिक्विंटल दर मिळत असून 7 हजार क्विंटलची आवक लातूर बाजार समितीमध्ये झाली होती.
सरकारच्या धोरणाचा परिणाम थेट दरावर होऊ लागला आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी हुकमी पीक असते, पण यंदा चित्र बदलले आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक करुनही फायदा झालेला नाही. त्यामुळे आता शेतकरी सोयाबीन बाजारपेठेत घेऊन येऊ लागला आहे.
अशोक अग्रवाल, व्यापारी, लातूर