Delhi – Mumbai Expressway : 220Km चा पहिला टप्पा होणार खुला, मुंबईतील JNPT मधून सुरु होणार जगातला सर्वात लांब महामार्ग..
दिल्ली – मुंबईला ये – जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्या देशाचे केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे खुला होण्याचे संकेत दिले आहे. त्यांनी ट्विटरवर या एक्स्प्रेसवेचे फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेले फोटो हे विरार – वडोदरा या टप्प्यातील महामार्गाचे आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही प्रवासाचा मोह आवरणार नाही !
राजधानी दिल्ली अन् देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा 1386 किमी लांबीचा जगातील सर्वात लांब मुंबई – दिल्ली एक्सप्रेस – वेचे काम प्रगतीपथावर असून लवकरचं या महामार्गाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
देशातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे दिल्ली – मुंबई ग्रीन कॉरिडॉर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिक्षेत आहे. दिल्ली ते दौसा या कॉरिडॉरचा 220 किलोमीटरचा भाग जवळपास तयार झाला आहे. या कॉरिडॉरच्या सुरुवातीसाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला (PMO) फाईल पाठवली आहे. पीएमओच्या मंजुरीनंतर हा कॉरिडॉर सुरू होणार आहे.
हा कॉरिडॉर सुरू होण्याची तारीख अनेक वेळा उलटून गेली आहे. दिल्ली ते दौसा या 220 किलोमीटर पर्यंतच्या कॉरिडॉरचे 99.9% काम पूर्ण झालं आहे. फिनिशिंगचे काम सुरू आहे. ग्रीन सिग्नल मिळताच हा महामार्गभाग पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कॉरिडॉरचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे NHAI अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कॉरिडॉरपासून कुंडली – मानेसर – पलवल एक्स्प्रेस वे KMP पर्यंत कनेक्टिव्हिटीचे काम सुरू आहे. ही कनेक्टिव्हिटी सुरू होताच केएमपीची वाहतूक गुडगाव शहरात न जाता या कॉरिडॉरमधून जाणार असून दिल्ली ते दौसा हे अंतर तुम्ही फक्त अवघ्या दोन तासांत पूर्ण करू शकणार आहे.
विमानाचेही होणार इमर्जन्सी लँडिंग :-
दिल्ली – मुंबई कॉरिडॉरचे डिझाईन असं आहे की, या महामार्गावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले तर त्यावरही विमान उतरवलं जाऊ शकतं. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (ṆNHAI) अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत, परंतु गरज भासल्यास, काही क्षेत्रे आहेत जिथे उच्च – ताणाच्या तारा नाहीत, जेथे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केलं जाऊ शकतं.
महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. हा महामार्ग सुरू झाल्याने दरवर्षी सुमारे 32 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन दरवर्षी सुमारे 85 कोटी किलोमीटरने कमी होईल, जे 4 कोटी झाडे लावण्याइतके आहे. महामार्गावर सुमारे 20 लाख रोपे लावण्यात आली आहेत.
कसा आहे दिल्ली – मुंबई कॉरिडॉर प्रोजेक्ट :-
देशातील पहिला ग्रीन कॉरिडॉर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 1380 किमी लांबीचा आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महामार्गावर ताशी 120 किमी वेगाने वाहने धावणार असून दिल्लीहून मुंबईला 12 तासांत पोहोचणे शक्य होणार आहे. कॉरिडॉर 12 लेनचा करण्याची योजना आहे.
आतापर्यंत संपूर्ण जगात 12 लेनचा एवढा लांब कॉरिडॉर नाही. सध्या हा महामार्ग आठ पदरी आहे. महामार्गाच्या मधोमध 21 मीटर रुंद जागा सोडण्यात येत असून, त्यावरील वाहतूक वाढताच दोन्ही बाजूला आणखी दोन लेन करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग 12 लेनचा होणार आहे.
हा महामार्ग पाच राज्यांमधून जाणार..
दिल्ली – मुंबई कॉरिडॉर एकूण पाच राज्यांमधून जाणार आहे. यामध्ये दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. हा एक्सप्रेसवे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद आणि सुरत या आर्थिक केंद्रांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करणार असून हा कॉरिडॉर सुरू झाल्याने व्यावसायिक संपर्क वाढून व्यापार वाढीला चालना मिळणार आहे.