शेतकऱ्यांना पीक विम्याचे दीड हजार कोटी वितरित! 52 लाख शेतकऱ्यांनी मिळाला लाभ, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती..
राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यांतील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपये इतका अग्रीम पीकविमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.
त्यापैकी 1690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
पीक विम्यासंदर्भात शशिकांत शिंदे, विक्रम काळे, अरुण लाड यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत उत्तरादाखल बोलताना मुंडे म्हणाले, 24 जिल्ह्यांत स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातन झालल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या.
मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केले होते. ते फेटाळून लावल्यानंतर काही पीक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते. यादरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ज्ञ, कृषी विद्यापीठांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले.
काही विमा कंपन्यांचे प्रलंबित अपील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पीक विमा दिला जाईल याबाबत कार्यवाही करू, असेही त्यांनी सांगितले..