Mumbai-Vadodara-Delhi Expressway: 1350Km अंतरासाठी 1 लाख कोटींचा खर्च, मुंबई ते दिल्ली गाठता येणार फक्त 12 तासांत; ‘या’ दिवशी होणार खुला..
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस – वेच्या विकासासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय सध्या जोमाने कामाला लागलं असून लवकरच तुम्हाला या नव्या एक्सप्रेस – वेवरून प्रवास करता येणार आहे. या मार्गाची खास गोष्ट अशी आहे की, यामुळे अनेक शहरांमधील अंतर कमी होणार आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ पूर्वीपेक्षा खूपच कमी होईल.
परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गामुळे तुमचा प्रवास 24 तासांवरून 12-12.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. म्हणजेच, तुम्ही आधीच्या तुलनेत निम्म्या वेळेत हा प्रवास पूर्ण करू शकाल. परिवहन मंत्रालयाच्या अहवालानुसार 1 लाख कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर वेगाने काम सुरू आहे. मार्च 2023 पर्यंत तुम्ही या मार्गावर प्रवास करू शकाल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याच कारण असं की, या एक्सप्रेस – वेच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून राजस्थानमधील दौसापर्यंत या 8 लेन एक्स्प्रेस वेचे बांधकाम पूर्ण झालं आहे.
आशियातील पहिला अँनिमल ओव्हरपास एक्सप्रेस – वे –
दिल्ली – मुंबई – वडोदरा एक्सप्रेसवे हा आशियातील पहिला अँनिमल ओव्हरपास एक्सप्रेस – वे आहे. बुंदी – सवाई – माधोपूर दरम्यान ग्रीन ओव्हरपास तयार करण्यात येत आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्रीन ओव्हरपास आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, बुंदी रामगड व्याघ्र प्रकल्प आणि कोटा मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पादरम्यान 5 ग्रीन ओव्हर पास बनवले जात आहेत. याशिवाय मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्पात 4Km लांबीचा बोगदा बांधण्यात येत असून दुसरा बोगदा महाराष्ट्रातील माथेरम इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बांधण्यात येणार आहे.
या एक्स्प्रेस वेवर देशात प्रथमच इलेक्ट्रिक लेनची सुविधा असणार आहे. गरज भासल्यास हा 8 लेन हायवे 12 लेन करता येणार असल्याची सुविधाही करण्यात आली आहे. या एक्स्प्रेस वेच्या उभारणीत जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे. या टेक्नॉलॉजीमुळे हा रस्ता 50 वर्षे तुटणार नसल्याचं जाणकारांचं मत आहे.
दिल्ली – मुंबई – वडोदरा एक्सप्रेसवे वर काय आहे खास ?
या एक्सप्रेस-वेवर प्रत्येक 500 मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या महामार्गावर स्पीड ब्रेकर असणार नाही. महामार्गावर जनावरे येऊ नयेत यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. महामार्गावर स्पीड गव्हर्नर बसवण्यात आले असून 120 Km चा वेग निश्चित करण्यात आला आहे. यापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास ऑनलाइन चलन कापले जाणार आहे. महामार्गावर सर्वत्र वाहने थांबविण्यास बंदी आहे. वाहनात दोष – असल्या – शिवाय गाडी कुठेही थांबवता येत नाही. महामार्गावर वाहन थांबवण्यासाठी विश्रांतीची जागा बनवली जाईल. महामार्गावर अपघाताच्या वेळी मदतीसाठी मोबाईल व्हॅनची सुविधा असणार आहे.
या एक्सप्रेस – वेचे वैशिष्ट्य म्हणजे ते मुंबई – जेवार विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांना जोडला जाणार आहे. यासोबत जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा आणि सुरत ही व्यावसायिक केंद्रेही जोडली जातील आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
महामार्गावर प्रत्येक 50 किलोमीटर अंतरावर 93 ठिकाणी विश्रांती क्षेत्रे (Rest area) तयार करण्यात येणार आहेत. विश्रांती क्षेत्रात रात्रीच्या मुक्कामासाठी हॉटेल, एटीएम, फूड कोर्ट, बर्गर किंग, सबवे आणि जनरल स्टोअर अशा सुविधा असतील..
एक्सप्रेस -वेवर हेलिपॅडचीही असणार सुविधा..
दिल्ली – वडोदरा – मुंबई एक्सप्रेस -वेवर हेलिपॅडची सुविधाही असेल. प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर ट्रॉमा सेंटर उभारले जातील. जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळू शकतील. एअर अँम्ब्युलन्ससाठी हेलिपॅडही बनवण्यात येणार आहेत.
टोल नेमका किती लागणार भरावा..
एक्स्प्रेस -वे वर प्रवेश करताना टोल कापला जाणार नाही. ज्यावेळी तुम्ही हायवे सोडाल त्यावेळी तुम्हाला टोल भरावा लागेल. या एक्स्प्रेस वेवर तुम्ही जितका जास्त प्रवास कराल तितका जास्त टोल भरावा लागेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारसाठी प्रत्येक किलोमीटरसाठी 0.65 पैसे टोल आकारला जाईल. मिनी बस आणि व्यावसायिक वाहनांसाठी 1.05 रुपये, बस आणि ट्रकसाठी 2.20 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 4.20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
एक्सप्रेस – वे नेमका कुठून जाणार ?
हा एक्सप्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. हा 8 लेन एक्सप्रेस वे 1350Km लांबीचा असेल. एक्सप्रेस – वे चा जास्तीत जास्त भाग गुजरातमध्ये 426Km, राजस्थानमध्ये 373Km, मध्य प्रदेशात 244Km, महाराष्ट्रात 171Km आणि हरियाणामध्ये 129Km असेल. हा रस्ता तयार करण्यासाठी 5 राज्यांतील 18000 हेक्टर जमीन वापरण्यात येणार आहे.
एक्सप्रेस – वे मुळे वाचणार प्रवासाचा वेळ..
दिल्ली ते जयपूर प्रवास करण्यासाठी 5 तास लागतात. मात्र हा महामार्ग बांधल्यानंतर ते अंतर अवघ्या 2 तासात पार करू शकतात. सध्या दिल्ली ते मुंबई या प्रवासासाठी 24 तास लागतात. मात्र हा एक्स्प्रेस वे केवळ 12 तासांत आर्थिक राजधानीत पोहोचेल. दिल्ली ते दौसा हे अंतर 4 तासांऐवजी 2 तासात कापलं जाईल. दिल्लीहून चंदीगडला जाताना 5 तासांऐवजी 5 तासात पोहोचेल..
कसा बांधला जात आहे एक्स्प्रेस -वे..
एक्स्प्रेस -वे तयार करण्यासाठी फायबरच्या मोठ्या दाण्यांना वापरलं जात आहे. यामध्ये विशिष्ट खडकाच्या मॅट्रिक्सचे सूक्ष्म पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे अवजड वाहनांमुळे रस्ता खचणार नाही. एक्स्प्रेस – वे मध्ये 10 वर्षांपासून काही अडचण असल्यास कंपनी ते दुरुस्त करेल. या रस्त्याच्या कामात 12 लाख टन स्टील वापरण्यात येणार आहे. जे 50 हावडा ब्रिजच्या बरोबरीचे आहे. एक्स्प्रेस वे बनवण्यासाठी 80 लाख टन सिमेंट वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 1 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार मिळत आहे.