Take a fresh look at your lifestyle.

Pune – Miraj Railway : दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण, 18 हेक्टरसाठी 47 कोटींचा मोबदला; रेल्वे लाईनचे कामही अंतिम टप्प्यात..

0

बहुप्रतीक्षित पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची 100 टक्के कार्यवाही पूर्ण केली असून, रेल्वेलाइनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरून रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतिमान प्रवासाची सोय होणार असून, परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.

पुणे- मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेची एकूण 280 कि. मी. पैकी पुणे जिल्ह्यातील बाधित लांबी 35 कि.मी. इतकी आहे. यासाठी जिल्ह्यातील 14 गावातील एकूण 18 हेक्टर जमिनीची आवश्यकता होती.

यात पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी ही 9 गावे, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती ही 3 तर दौंड तालुक्यातील डाळिंब व ताम्हणवाडी या दोन गावांचा समावेश आहे.

भूसंपादन करण्यात आलेल्यापैकी 13.10 हे. आर खासगी जमीन होती. तर 0.3475 हे. आर सरकारी जमीन तर 4.55 हे. आर वनजमीन हस्तांतरीत करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय प्रवीण साळुंके यांनी सातत्याने समन्वय राखत भूसंपादन कार्यवाहीला गती दिली.

दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तसेच हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी भूसंपादनाची कार्यवाही 8 महिन्यांतच पूर्ण केली. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती मिळाली.

महसूल, वन विभाग, रेल्वे, तसेच नगररचना व मूल्यांकन विभागांच्या योग्य समन्वयामुळे रेल्वेला या जमिनीचा ताबा गतीने देता आला. रेल्वे विभागाने विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीचा ताबा पूर्वीच घेऊन काम जवळपास पूर्ण केले आहे. पुणे / घोरपडी सासवड रोड, सासवड रोड – फुरसुंगी, फुरसुंगी – आळंदी, दौंडज – वाल्हा, आळंदी- शिंदवणे, आंबळे- राजेवाडी, राजेवाडी- जेजुरी, जेजुरी- दौंडज आणि वाल्हा – नीरा या ब्लॉक सेक्शनमधील कामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहेत.

भराव, लहान – मोठे पूल, रेल्वे ओलांडणी पूल, अंडरपास इत्यादी कामे प्रगतिपथात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

जमीनमालकांना 47 कोटी रुपयांचा मोबदला..

प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया जून 2022 पर्यंत पूर्ण करण्यात आली. उर्वरित खासगी जमीन सक्तीने संपादित करण्याची प्रक्रिया जुलै 2022 पासून गतीने राबविली.

20 ऑक्टोबरपर्यंत 6 गावांची भूसंपादनाची अधिसूचना जारी करून अंतिम निवाडे 30 नोव्हेंबरपर्यंत जाहीर करण्यात आले. राहिलेल्या वाल्हे या एका गावातील जमिनीची भूसंपादनाची अधिसूचना 30 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली असून, नुकतेच हे निवाडे जाहीर करण्यात आले.

या एकूण जमीन खरेदी व भूसंपादनाचा 47 कोटी 40 लाख रुपयांचा मोबदला जमीनमालकांना देण्यात आला आहे. दुहेरी रेल्वेलाइनमुळे रेल्वेवाहतूक वेगवान होणार असल्याने त्याचा फायदा दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, नोकरदार, व्यापारी आदींना होणार आहे.

शेतमाल, तसेच अन्य नाशवंत माल वेळेवर पोहचून मालाला जास्त दर मिळू शकेल. दुहेरी रेल्वेलाइनमुळे क्रॉसिंगसाठीचा वेळ वाचणार असल्याने रेल्वे मार्गावरील गावातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.