डोंबिवली ते ठाणे गाठा फक्त 15 मिनिटांत..! 6 वर्षांपासून रखडलेला खाडीपूल ‘या’ दिवशी होणार खुला, पहा कसा असणार रूट..
मुंबई शहरासह – उपनगरांना कमी वेळात जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुलांचे काम सुरु आहे. सध्या डोंबिवली माणकोली ते मोठागाव ठाकुलीं जोडणाऱ्या खाडीपुलाची गेल्या दीड दशकापासून चर्चा सुरू आहे. डोंबिवली येथून ठाण्याला ये – जा करण्यासाठी कल्याण किंवा मुंब्रा मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गामुळे वेळ व इंधन अधिक प्रमाणात खर्च होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जवळपास हे अंतर पूर्ण करण्यासाठी तासाभराहून अधिक वेळ लागतो.
त्याला पर्याय म्हणून डोंबिवलीतील मोठागाव ते भिवंडीतील माणकोलीपर्यंतच्या खाडीपुलाचे कामाचे साडेसहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र भूसंपादनाचे काम व पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी हा प्रकल्प रखडला गेला. अवघ्या 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र आतापर्यंत साडेसहा वर्षे या प्रकल्पाला झाली आहेत.
आत्तापर्यंत या प्रकल्पाचे काम 85 टक्के पूर्ण झाले असून आजही 15 टक्के काम शिल्लक असून महिनाभरात हा पूल पूर्ण करून एप्रिल 2023 मध्ये जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे. पूल पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली-भिवंडी-ठाणे आणि जवळपासच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ 15 मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिली.
MMRDA मार्फत या पुलाचे काम करण्यात येत असून जून 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील माणकोली येथे या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी हा शासकीय कार्यक्रम भाजपने हायजॅक केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता, तर भाजपच्या खेळीला काटशह देण्यासाठी शिवसेनेने त्या कार्यक्रमाच्या आधी कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली मोठागाव ठाकुर्ली येथे प्रतीकात्मक भूमिपूजन उरकले होते.
खाड़ीच्या अलीकडे भाजपचे तर खाडीच्या पलीकडे शिवसेनेचे खासदार असताना या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यावेळी शिवसेना – भाजपमध्य जणू स्पर्धाच लागली होती. डोंबिवलीतील मोठागाव ते भिवंडीतील माणकोलीपर्यंतच्या खाडीपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या जमिनीचे भूसंपादन व पर्यावरण विभागाची मंजुरी मिळवणे गरजेचे होते. मात्र डोंबिवली पश्चिमेला थेट खाडीपर्यंत रस्ता असल्याने केवळ सीआरआरझेड क्षेत्रातील जमिनीचे भूसंपादन करावे लागले.
या ठिकाणी प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीचे कामदेखील सुरू झाले. याउलट ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या पुलाचे भूमिपूजन केले तेथील भूसंपादन प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. परिणामी भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने माणकोली भागात प्रत्यक्ष काम रखडले होते. आज मात्र भिवंडीकडील भागातील काम जलदगतीने पूर्णत्वास गेल्याचे दिसत आहे. सुमारे 223 कोटी 25 लाख रुपये खर्च असणाऱ्या या 4.60 किलोमीटर सहापदरी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांची मुदत देण्यात आली होती.
मात्र निर्धारित वेळेत पुलाचे काम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. सध्या डोंबिवली येथून ठाण्याला ये – जा करण्यासाठी कल्याण किंवा मुंब्रा मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गामुळे वेळ व इंधन अधिक प्रमाणात खर्च होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
हा पूल पूर्ण झाल्यावर डोंबिवलीतून ठाणे गाठण्यासाठी अवघ्या 20 मिनिटांचा अवधी लागणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मंगळवारी MMRDA चे आयुक्त एस . व्ही.आर. श्रीनिवास यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या एप्रिलअखेर काम पूर्ण होईल, अशी माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली.