Ahmednagar Krushi Market : कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा..! सर्वच शेतमालाचे भाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात, पहा बाजारभाव
दुष्काळामुळे पाण्याची टंचाई भासत असल्याने सध्या उपलब्ध पाण्यात कांदा पीक काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कांदा लागवड करण्यासाठी बाहेरगावावरून मजूर आणुन मोठा खर्च करून लागवडी होत आहेत. तर दुसरीकडे मात्र कांद विक्रीतून शेतकऱ्यांच्या हातात झालेला खर्च देखील पडत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत अवघड झाली आहे. एक एकर कांदा लागवडीसाठी सात हजार रुपयांचा खर्च येत असून उर्वरित खर्चही शेतकऱ्यांना करावा लागत असल्याने एका एकरासाठी सुमारे दहा हजार रुपयांचा खर्च होत आहे. पर्यायाने उत्पादन खर्चातही वाढ झाल्याने कांदा विक्रीसाठी येईपर्यंत कोणतीच हमी नसल्याने कांदा पीक बेभरवशाचे बनले आहे.
सध्या कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तरी कांदा लागवडीसाठी शेतकरी प्राधान्य देत आहेत. शुक्रवारी बाजार समितीत कांदा विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास प्रतिक्विंटल 200 ते 800 असा दर मिळाला.
लाल कांद्याचे बंपर उत्पादन झाल्याने साठवून ठेवलेल्या गावरान कांद्याला दर राहिला नाही. सुमारे सात ते आठ महिने कांदा सांभाळूनही अनेक शेतकरी अक्षरशाः तोट्यात गेले आहेत. बहुतांश ठिकाणी कांदा खराब झाल्याने शंभर टक्के नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर :
टोमॅटो :- 225 – 1100, वांगी :- 500 – 2000, फ्लावर :- 300 – 1700, कोबी :- 500, काकडी :- 1100 – 2900, गवार :- 10,000 – 20,000, घोसाळे :- 1800 – 2000, दोडका :- 2000 – 4000, कारले :- 2100 – 4500,
भेंडी :- 2000 – 4800, वाल :- 1000 – 2000, घेवडा :- 1500 – 3500, डिंगरी :- 1000 – 1800, बटाटे :- 500 – 1500, लसूण :- 2500 – 7500, हिरवी मिरची :- 2000 – 4000, शेवगा :- 1500 – 5000, लिंबू :- 1500 – 7200,
दु. भोपळा :- 1000 – 2000, शिमला मिरची :- 1700 – 4100, मेथी :- 400 – 600, कोथिंबीर :- 300 – 500, पालक :- 400 – 500, कांदा पात :- 500 – 700.