आष्टीच्या पेरूची गुजरातमध्येही गोडी..! युवा उद्योजकाची जिल्हाभर चर्चा, पहिल्याच वर्षी पेरू लागवडीतून घेतलं 5 लाखांचं उत्पन्न..
देशात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. दिवसभर उन्हामध्ये काबाड कष्ट करून देखील शेतकऱ्याला हवा तसा नफा मिळत नाही. मात्र या सर्व गोष्टी असूनही देशातील शेतकरी न थकता आपले कर्तव्य पार पडत असतात. अश्यावेळी यासर्वांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करायचे असल्यास पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन मार्गांचा अवलंब केला गेला पाहिजे.
शेतीचा उद्योग करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उत्कृष्ट नियोजन करून त्यास कष्टाची जोड असेल तर शेतीच काय; पण कुठलाच व्यवसाय हा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. हीच गोष्ट आष्टी तालुक्यातील खाकाळवाडी येथील ईश्वर काशिनाथ शिंगटे व त्यांच्या पत्नी छायाताई ईश्वर शिंगटे या कष्टाळू दाम्पत्यांनी दाखवून दिले आहे.
निसर्गाच्या लहरीपणाने निराश न होता खाकळवाडी येथील ईश्वर शिंगटे या तरुण उद्योजकाने वडिलोपर्जित शेतीला पूर्णवेळ देत मातीचे सोने करून दाखवले आहे. यासाठी शिंगटे यांनी शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत तीन हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून 1000 पेरूच्या झाडांची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
शिवाय या बागेतून शिंगटे यांनी एकाच वर्षात अडीच लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे शिंगटे यांच्या पेरूची गोडी महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरसारख्या मोठ्या शहराच्या बाजारपेठेत चर्चेचा विषय तर ठरला आहेच पण सोबतच गुजरातमधील सुरत सारख्या शहरात देखील याची चर्चा होताना दिसत आहे.
शिंगटे यांचा अन्नप्रक्रिया करण्याचा उद्योग होता मात्र मागील दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे त्यांचा हा उद्योग अडचणीत आला होता. यामुळे दरम्यानच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मात्र, या परिस्थितीमुळे निराश न होता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांनी आपल्या वडिलोपर्जित शेतीकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले.
ईश्वर शिंगटे यांनी तीन हेक्टर क्षेत्रावर पेरू फळबागेची नियोजनबद्ध यशस्वी लागवड करून दाखवली आहे. शेंगटे यांनी एका वर्षात जवळपास 4 ते 5 लाखांचे उत्पन्न घेऊन शेतीबाबत नकारात्मक विचार करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
शिंगटे यांनी 2020 साली तीन हेक्टर क्षेत्रात शेती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पेरूची फळबाग लावली. यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील येवला येथून तैवान जातीची एक हजार पेरूची रोपे आणून 3 X 5 अंतरावर खड्डे घेऊन लागवड केली.
तसेच पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचन प्रणालीचा वापर केला. फळ बागेसाठी खते, औषधे, मशागत, फवारणी व मजुरांसहीत आतापर्यंत 1 लाखाचा खर्च झाल्याचे शिंगटे यांनी सांगितले.
शिंगटे दाम्पत्याने पेरूच्या शेतीतून वर्षाला जवळपास 4 ते 5 लाखांचे उत्पन्न पदरात पाडून घेतले आहे. विशेष म्हणजे या पेरूच्या बागेतुन त्यांनी पेरू सोबत सोयाबीन, उडीद, हरभरा यांसारखे आंतरपीक घेऊन शेतीच्या उत्पन्नात वाढ करून दाखवली आहे.
या दाम्पत्याने जिद्दीला कष्टाची जोड देऊन इच्छाशक्तीच्या बळावर अवघ्या दोन वर्षांतच पेरूची फळबाग फुलवली. सध्या शेकडो पेरूच्या झाडांना मोठ-मोठी चमकदार फळे लगडलेली पहावयास मिळत आहे.