अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. जिल्ह्याची माहिती आल्यानंतर केंद्र सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला असून, त्यांच्या इतिहासाचे स्मरण होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींची आहे.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करावे , अशी मागणी विधान परिषदेतील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या चर्चेत आमदार राम शिंदे, महादेव जानकर यांनीही सहभाग घेतला.
त्याला उत्तर देताना केसरकर म्हणाले, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अहमदनगरच्या नामांतरासाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठवण्यास कळवले आहे.
शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे. सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.