Take a fresh look at your lifestyle.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे : जगातला पहिला सर्वात लांब एक्सप्रेस- वे 12 फेब्रुवारीला सुरु होणार, नितीन गडकरींची माहिती, पहा रोडमॅप..

0

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते खूप महत्वाची भूमिका पार पडतात. रस्त्यांबाबतचे नितीन गडकरींचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या वर्षी पूर्ण होणार आहेत. या वर्षी देशातील नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानंतर पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पुढील एका वर्षात अनेक प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत.

यामध्ये दिल्ली – मुंबई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे पहिल्या क्रमांकावर असणार आहे. देशाची राजधानी दिल्लीला आर्थिक राजधानी मुंबईशी जोडणारा हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरणार आहे. तसेच हा द्रुतगती मार्ग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरणार असे म्हटले जात आहे.

सोहना ते दौसा मार्गाचे काम पूर्ण झाले असून पंतप्रधान मोदी, रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी 12 फेब्रुवारी रोजी या एक्सप्रेस – वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दरम्यान देशात अनेक एक्सप्रेस – वे बांधले गेले असले तरी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाची बातच काही औरचं आहे. अखेर या एक्स्प्रेस – वे मध्ये असे विशेष काय आहे की त्याची जगभरात चर्चा होत आहे, चला तर मग जाणून घेऊया ?

दिल्ली – मुंबई द्रुतगती मार्ग हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरणार आहे. ज्याची एकूण लांबी सुमारे 1,390 किमी आहे. या महामार्गाची बांधणी जर्मन तंत्रज्ञानाने केली जात असून पुढील 50 वर्षांपर्यंत या महामार्गाची कोणतीही झीज होणार नाही. असे म्हटले जात आहे. यामध्ये एकूण 12 लाख टन स्टीलचा वापर केला गेला आहे, यासोबतच या प्रकल्पात 35 कोटी घनमीटर माती आणि सुमारे 80 लाख टन सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.

सोबतच हा देशातील पहिला विद्युत महामार्गही ठरणार आहे. यामध्ये प्रवासादरम्यान वाहने रिचार्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सध्या हा एक्सप्रेस वे 8 लेनचा असला तरी भविष्यात तो 12 लेनपर्यंत वाढवता येणार आहे. या एक्स्प्रेस वेवर ताशी 120 किमी वेगाने गाड्या धावणार असून दिल्ली ते मुंबई हा प्रवास केवळ 12 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या मुंबई ते दिल्ली प्रवास करण्यासाठी 24 तास लागतात. या महामार्गाच्या बांधकामासाठी 1.1 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

विकासाचा एक्सप्रेस वे :-

हा एक्सप्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 6 राज्यांमधून जाणार आहे. वन्यजीवांसाठी ग्रीन ओव्हरपासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आशिया खंडातील हा पहिलाच महामार्ग ठरणार आहे. यासोबतच या महामार्गावर इंडस्ट्रियल कॉरिडॉरही विकसित करण्यात आले आहेत. हा एक्स्प्रेस वे खर्‍या अर्थाने देशाच्या प्रगतीचा एक्स्प्रेस वे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा एक भाग म्हणून हा एक्सप्रेस – वे बांधला जात आहे. एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर देशाचा जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चित्तोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, वडोदरा या आर्थिक केंद्रांशी संपर्क सुधारण्यास मदत होणार असून या शहरांतील आर्थिक घडामोडींना चालना मिळणार आहे

हा संपूर्ण एक्सप्रेस – वे पुढील वर्षी मार्चपर्यंत तयार होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच सांगितले होते की, दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या सोहना – दौसा विभागाचे या महिन्याच्या अखेरीस उद्घाटन केले जाईल. परंतु आता त्यांनी ट्विटरवर अशी माहिती दिली आहे की, या एक्सप्रेस – वेचे 12 फेब्रुवारीला उदघाटन होणार आहे.

यामुळे दिल्ली आणि जयपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 2 तासांवर येईल. दिल्ली आणि जयपूरमधील अंतर अंदाजे 270 किमी आहे. सोहना-दौसा विभाग हा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा आहे. सोहना-दौसा हा रस्ता डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण व्हायचा होता, मात्र कोरोना महामारीमुळे त्याच्या कामाच्या गतीवर परिणाम झाला.

NHAI ने या संपूर्ण मार्गावर सुमारे 1.5 लाख रोपे लावली आहेत. या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्हीची निगराणी असणार आहे, त्यामुळे या महामार्गावर कसलेही अनुचित प्रकार आणि गुन्ह्यांवर नियंत्रण आणले जाऊ शकते. सोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन देखील केले जाऊ शकत नाही.

किती असेल टोल..

या द्रुतगती मार्गावर हेलिपॅड बांधण्याची देखील योजना आहे. त्यामुळे अपघात झाल्यास जखमींना लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करता येईल. 9 मार्च 2019 रोजी दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेची पायाभरणी करण्यात आली आहे. हा एक्सप्रेसवे ऍक्सेस कंट्रोल आहे. म्हणजे महामार्गाच्या मध्यभागी कोणीही एका बाजूने दुसरीकडे जाऊ शकणार नाही. एक्स्प्रेस वेचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इंधनाचा वापर 32 कोटी लिटरने कमी होणार आहे. तसेच यामुळे, 85 कोटी किलो कार्बन डायऑक्साइड (CO2) उत्सर्जन कमी होईल, जे चार कोटी झाडे लावण्याइतके आहे. या गोष्टी पर्यावरणासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. महामार्गावर प्रत्येक 500 मीटर अंतरावर पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला 40 लाख झाडे लावण्याचे देखील नियोजन आहे.

या एक्स्प्रेस वेवर टोल वसूल करण्यासाठीही विशेष पद्धत अवलंबण्यात आली आहे. यावर, तुमचे वाहन जेवढे किलोमीटर धावेल त्याप्रमाणे तुम्हाला टोल भरावा लागेल. मात्र, या टोलबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. मात्र इतर एक्सप्रेस – वेच्या तुलनेत यावर कमी टोल भरावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रवासी वाहनांसाठी त्याचा दर प्रति किलोमीटर 2 रुपये असेल, तर व्यावसायिक वाहनांसाठी तो 7 रुपये प्रति किलोमीटर असणार आहे. यातील एक वैशिष्ट्य म्हणजे प्रवेशाच्या वेळी कोणताही टोल आकारला जाणार नाही. मात्र बाहेर पडताना टोल भरावा लागेल.

वाहन थांबवल्यावर कापलं जाणार चलन..

एक्सप्रेस – वेवर 93 ठिकाणी रेस्ट एरियास म्हणजे विश्रांती क्षेत्रे बनवण्यात येणार आहेत. म्हणजेच दर 50 किलोमीटरवर एक रेस्ट एरियास असणार आहे. यामध्ये पेट्रोल पंप, मोटेल, विश्रांती गृह, रेस्टॉरंट आणि दुकाने असतील. मुलांना खेळण्यासाठी एक मजेदार उद्यान असेल. म्हणजेच तुम्ही दिल्ली ते मुंबई असा प्रवास करताना पिकनिक देखील करू शकता. या एक्स्प्रेस वेवर ताशी 120 किमी वेगाने वाहने धावतील.

परंतु तांत्रिक बिघाड झाल्याशिवाय तुम्ही वाहन कुठेही थांबवू शकत नाही. असे केल्याने तुमचे चलन कापले जाईल. वाहनांना फक्त विश्रांती क्षेत्रात थांबण्याची परवानगी आहे. ओव्हरस्पीडवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी स्पीड गन देखील बसवण्यात आले आहेत. जर कोणी जास्त वेगाने गाडी चालवली तर त्याचे ऑनलाइन चलन कापले जाईल. मोबाईलवर मेसेज येईल आणि दंडही लगेच वसूल होईल.

भटकी जनावरे रस्ता ओलांडू नयेत म्हणून महामार्गाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. आशिया खंडातील हा पहिलाच महामार्ग आहे, ज्याच्या बांधकामात वन्यजीवांसाठी ग्रीन ओव्हरपासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याअंतर्गत आठ लेनचे दोन बोगदे करण्यात येणार आहेत. यापैकी एक बोगदा प्रथम राजस्थानमधील मुकुंदरा अभयारण्यातून बांधला जात आहे. दुसरा बोगदा महाराष्ट्रातील माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बांधण्यात येणार आहे. त्याची लांबीही चार किलोमीटर आहे.

या एक्स्प्रेस वेचा 160 किमी भाग हरियाणामध्ये, 374 किमी भाग राजस्थानमध्ये, 245 किमी भाग मध्य प्रदेशात आणि 423 किमी भाग गुजरातमध्ये आहे. तर 174 किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात असणार असून मुंबईतील JNPT मधून सुरु होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.