महाराष्ट्राला वंदे भारत एक्स्प्रेसची भेट ! मुंबई – पुणे -सोलापूर व मुंबई – शिर्डी 110Kmph च्या स्पीडने धावणार, पहा टाइम टेबल अन् स्टेशन्स..
देशात सध्या नरेंद्र मोदी एका पाठोपाठ एक विकास कामांचे लोकार्पण करत आहेत. याचदरम्यान महाराष्ट्राला देखील एकाच वेळी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईत या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्या मुंबई ते साईनगर शिर्डी आणि मुंबई ते सोलापूरपर्यंत धावणार आहेत. एकाच वेळी दोन वंदे भारत ट्रेन लोकसेवेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
16 डब्यांच्या या गाड्यांमध्ये एकावेळी 1,128 प्रवासी प्रवास करू शकतात. महाराष्ट्रात सध्या दोन वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. एक ट्रेन मुंबई ते अहमदाबाद आणि दुसरी नागपूर ते बिलासपूर अशी धावत आहे. परंतु महाराष्ट्र वासियांना या ट्रेनचा म्हणावा तितकासा फायदा होत नव्हता. आता वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापर अन् मुंबई ते साईनगर शिर्डी अशी सुरु झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एका वंदे भारत ट्रेनची किंमत तब्बल 110 कोटी रुपये आहे. वंदे भारत ट्रेन 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. मात्र भारतीय रेल्वे बोर्डाने त्यांना सध्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे. या ट्रेन विषयी भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात कुतुहूल आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) येथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत दोन्ही गाड्या आठवड्यातून सहा दिवस धावतील. सीएसएमटी – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईहून दुपारी 3 वाजता आपल्या पहिल्या प्रवासात निघेल, आणि दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाडमार्गे शिर्डीला पोहोचेल. तर सोलापूर – सीएसएमटी हा प्रवास सोलापूरहून सुरु होईल. ही ट्रेन सोलापूरहून दुपारी 3 वाजता सुटून कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादरमार्गे सीएसएमटीला पोहचणार आहे.
सीएसएमटी – साईनगर शिर्डी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन मुंबईच्या सीएसएमटी येथून सकाळी 6.15 वाजता सुटून दुपारी 12.10 वाजता साईनगर शिर्डीला पोहोचेल. परतीच्या दिशेने ती साईनगर शिर्डी येथून 5.25 वाजता सुटेल आणि 23.18 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. सध्या सीएसएमटी ते साईनगर शिर्डी दरम्यान कोणतीही थेट ट्रेन नाही.
सध्या दादर ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला 8 तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर 5 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. ही ट्रेन सीएसएमटी ते कसारा दरम्यान ताशी 105 किमी आणि इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान 120 किमी प्रतितास वेगाने धावेल. त्याचा वेग कसारा ते इगतपुरी दरम्यान ताशी 55 किमी आणि पुणतांबा ते साईनगर शिर्डी दरम्यान 75 किमी प्रतितास असेल. मार्गात दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबणार आहे.
सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
सीएसएमटी – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूरहून सकाळी 6:05 वाजता मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल आणि दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तर परतीच्या दिशेने ती सीएसएमटी येथून 4.10 वाजता सुटेल आणि 22.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. हा संपूर्ण प्रवास साडेसहा तासांत पूर्ण होणार आहे.
सध्या मुंबई ते सोलापूरदरम्यान धावणारी सिद्धेश्वर एक्स्प्रेसला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी 8 तास लागतात. त्यामुळे वंदे भारतच्या प्रवाशांचा दीड तास वाचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल. ही ट्रेन लोणावळा ते सोलापूर दरम्यान 110 किमी, सीएसएमटी ते कर्जत दरम्यान 105 किमी आणि कर्जत ते लोणावळा दरम्यान 55 किमी प्रति तास वेगाने धावणार आहे.
400 हून अधिक नवीन वंदे भारत धावणार ?
भारतीय रेल्वेची या वर्षाच्या अखेरीस 75 वंदे भारत ट्रेन आणि पुढील तीन वर्षांत 400 नवीन ट्रेन ट्रॅकवर उतरवण्याची योजना आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची रचना आणि निर्मिती इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) पेरांबूर, चेन्नई येथील प्रमुख ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे भरतीतील उद्योगांना देखील चालना मिळत आहे.