पुणे-सातारा-सोलपूरकरांसाठी खुशखबर ! देशातला पहिला कॅनॉल जोड प्रकल्प महाराष्ट्रात, 4000 कोटींच्या निधीला मान्यता, ‘या’ तालुक्यांना होणार फायदा..
पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सिंचनास लाभ होणाऱ्या नीरा – देवघर पाटबंधारे प्रकल्पाच्या 3 हजार 976 कोटी 83 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या प्रकल्पामुळे पुण्यासह सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतील 43 हजार 50 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठ्याचे नियोजन असून देशातील तो पहिलाच कॅनॉल जोड प्रकल्प असणार आहे.
नीरा – देवघर प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. नीरा – देवघर पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मौजे देवघर येथे कृष्णा खोऱ्यातील भीमा उप खोऱ्यातील नीरा नदीवर मातीचे धरण बांधण्यात आले आहे.
सन 2008 पासून धरणामध्ये पूर्णक्षमतेने 338 दलघमी इतका पाणी साठा होत आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत आहे. या प्रकल्पामुळे भोर तालुक्यातील 7 हजार हेक्टर, सातारा जिल्हातील अवर्षण प्रवण खंडाळा तालुक्यातील 12 हजार हेक्टर व फलटण तालुक्यातील 13 हजार 550 हेक्टर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 10 हजार 970 हेक्टर असे एकूण 43 हजार 50 हेक्टर क्षेत्रास प्रवाही व उपसा पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा
उपसा सिंचन योजना, महावितरण कंपनीसंबंधित विविध कामे यासह विविध योजनांची आढावा बैठक मंगळवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कृष्णा – भीमा स्थिरीकरण प्रकल्प दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने विविध बाबींची पूर्तता तत्काळ करून घ्यावी. उरमोडी धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
प्रकल्पातील उर्वरित त्रुटींची दुरुस्ती महिनाभरात पूर्ण करावी. शिवाय उरमोडी ते वाढार किरोली याठिकाणी बंदिस्त जलवाहिनीचे कामही हाती घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या. यामुळे माण, खटाव या दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे.