भारतातला पहिला अनोखा रस्ता महाराष्ट्रात, 22Km अंतरासाठी 25,000 कोटींचा खर्च, 8 लेन, 3 इंटरचेंज, 4 सी लिंक, 2 बोगदे, पहा संपूर्ण रोडमॅप..
राज्यातल्या पुणे – मुंबई – नाशिक – नागपूर सारख्या मोठ्या शहरांत वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे.. रस्त्यांची लांबी-रुंदी पूर्वीइतकीच परंतु गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना तासंतास या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे सध्या शहरांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकार अँक्शन मोडवर आलं असून एक्सप्रेस- वे, हायवे, पूल, सी लिंक, भुयारी मार्ग शहरांतर्गत रिंग रोड, मेट्रो व निओ मेट्रो सेवांच्या उभारणीचे काम जोमात सुरु आहे.
आपल्या राज्याची राजधानी व देशाच्या आर्थिक राजधानी बद्दल पाहिलं तर मुंबईकरांना दररोज अनेक तास वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. शहर जुने आहे. जागेचीही कमतरता असून लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मुंबईत नवीन रस्ता बांधण्यासाठी जमीन नाही. त्यामुळेच काही वर्षांपूर्वी पर्याय म्हणून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर रस्ता बांधण्याचा विचार सुरू झाला. मुंबईच्या किनारी भागाच्या सर्वेक्षणानंतर तज्ज्ञांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे स्वप्न सुरू झालं असून ते आता हळूहळू पूर्ण होत आहे.
प्रस्तावित आराखड्यानुसार, मुंबईचा मरीन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईतील कांदिवली हा समुद्रमार्गे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत जोडला जाणार आहे. मरीन ड्राइव्ह ते कांदिवली हे अंतर अंदाजे 22.02 किलोमीटर आहे. या दोन मार्गांचा मध्य म्हणजे बांद्रा – वरळी सी लिंक ला जोडला जाणार आहे त्याच अंतर 5.6 किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे या अनोख्या रस्त्याचं एकूण अंतर 29.2 किलोमीटर इतकं आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचे आहेत दोन टप्पे..
टप्पा 1 –
मरीन ड्राइव्ह, मुंबई पासून वरळी सी लिंक 10.58 किमी
2. दुसरा टप्पा
वरळी सी लिंक ते कांदिवली 12.04 किमी
2018 साली झाली कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात..
कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा एकूण खर्च 12.5 हजार कोटींहून अधिक आहे. कोस्टल रोडच्या बांधकामाला 2018 साली सुरुवात झाली. चार वर्षांत या प्रकल्पाचे 75% काम पूर्ण झालं असून हा प्रकल्प नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
कोस्टल रोडची ही आहे खासियत..
मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत समुद्रकिनाऱ्याखाली 2 Km लांबीचे दोन समांतर बोगदे बांधले जात आहेत.
देशातील अशा प्रकारचा हा पहिला बोगदा आहे, ज्याचा व्यास 11 मीटर आहे आणि जो समुद्र किनाऱ्यापासून जवळचं बांधला गेला आहे.
कोस्टल रोडवर 3 इंटरचेंज आणि 4 अंडरग्राउंड पार्किंग असणार आहे.
कोस्टल रोड हा 8 लेनचा फ्री – एक्सप्रेस वे असणार आहे.
मोनोपाइल तंत्राचा वापर करून एकूण 176 खांब बांधले जात आहेत.
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शहरासाठी फुलपाखरू उद्यान, डायव्हर्सिटी पार्क तसेच 8.50 किलोमीटर लांब आणि 20 मीटर रुंद समुद्री रिसॉर्ट्स करण्यात येणार आहे. सायकल ट्रॅक, ओपन एअर थिएटर, पर्यटकांना बसण्यासाठी जागा यासह 1800 वाहनांसाठी अंडरपास पार्किंगही करण्यात येणार आहे.
श्यामलदास गांधी फ्लायओव्हर प्रिन्सेस स्ट्रीट ते राजीव गांधी सेतू (वांद्रे-वरळी सीलिंक) पर्यंतच्या 10.58 किमी कोस्टल रोडचे काम जोरात सुरू आहे.
या रस्त्यासाठी 111 हेक्टर जमीन केली संपादित..
कोस्टल रोडसाठी एकूण 111 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यापैकी 26.50 हेक्टर जमीन प्रकल्प उभारणीसाठी, 14.50 हेक्टर समुद्र संरक्षण भिंतीसाठी आणि 70 हेक्टर सार्वजनिक जागेसाठी वापरली जाणार आहे.
कोस्टल रोड प्रकल्पाचे हे फायदे आहेत :-
1) मरीन ड्राइव्ह ते वरळी सी लिंक हा 50 ते 60 मिनिटांचा प्रवास सुमारे 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
2) ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल
3) सुमारे 34 टक्के इंधनाची बचत होणार आहे.
4) दक्षिण आणि पश्चिम मुंबईची कनेक्टिव्हिटी सुधारेल.
5) प्रदूषण कमी झाल्याने लोकांचे आरोग्यही सुधारेल.
कोस्टल रोड प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे ‘सी वॉल’..
मुंबई हे समुद्रकिनारी असलेलं शहर असल्याने अनेकदा अरबी समुद्राच्या उंच -उंच लाटा येतात. विशेषत: पावसाळ्यात जेव्हा भरती असते तेव्हा उंच लाटा उसळतात. या प्रचंड लाटांमुळे कोस्टल रोडच्या संरचनेला हानी पोहोचू नये म्हणून किनाऱ्यावर मजबूत समुद्र भिंत बांधली जात आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे 8 मीटर उंच भिंत बांधली जात आहे.
कोस्टल रोडचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बोगदा..
देशातील सर्वात मोठ्या टनेल बोरिंग मशीन ‘मावळा’च्या (Mavala Machine) मदतीने हा बोगदा खोदण्यात आला. गिरगाव चौपाटी मलबार हिल ते प्रियदर्शनी पार्क असा हा बोगदा करण्यात आला आहे. पहिल्या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून दुसऱ्या समांतर बोगद्याचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. मलबार हिलमध्ये हा बोगदा जमिनीपासून सुमारे 75 मीटर खाली आहे. आणि गिरगाव चौपाटीमध्ये हा बोगदा जमिनीपासून 25 मीटर खोल करण्यात आला आहे.
बोगदा बनवताना काय होती आव्हाने..
हा बोगदा बनवताना अनेक आव्हाने होती. समुद्रातून लाटा उसळत असतानाही अथक परिश्रमानंतर या बोगद्याचा पहिला भाग पूर्ण झाला आहे. बोगद्यात सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे जसे की, बोगद्यात प्रत्येक 300 मीटर अंतरावर क्रॉसवे असेल. वाहनचालकांना चालण्यासाठी पायवाट असेल. एका बोगद्यात 3 लेन असतील. दोन लेन वाहनांसाठी असतील तर तिसरी लेन आपत्कालीन परिस्थितीसाठी असेल.
बोगद्यात अग्निसुरक्षेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येथे रात्रंदिवस काम सुरू आहे. मुख्य जंक्शन असल्याने येथे सतत वाहतूक कोंडी होते. या सर्व समस्या असतानाही बांधकामे अव्याहतपणे सुरू आहेत. प्रकल्प अभियंता चेतन खेडेकर यांनी संपूर्ण बांधकाम कसे सुरू आहे हे सांगितले.