जालना-नांदेड एक्सप्रेस-वे: शेतकऱ्यांचे 8 मार्चला सरण आंदोलन; एकरी 1 ते 1.50 कोटींचा चालू बाजारभाव पण, रेडी रेकनरप्रमाणे फक्त 5 लाख दर..
जालना ते नांदेड समृद्धी महामार्गातील संपादित होणाऱ्या जमिनींचा मावेजा बाजार भावाप्रमाणे मिळावा यासाठी शेतकरी कृती समिती नांदेडच्या वतीने आढावा बैठक घेऊन आंदोलन दिशा ठरविण्यात आली.
याबाबत शासन निर्णय घेत नसल्याने बाधीत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 8 मार्च रोजी धरणे तर 15 मार्चला सरण आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील तुप्पा, काकांडी, बाभुळगाव, गुंडेगाव, पांगरी, बाभुळगाव, पिंपळगाव, जैतापूर, नाळेशवर, बोरगाव, विष्णुपुरी, कल्लाळ सह 12 गावातून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जालना ते नांदेडमध्ये जात असून सदर गावातील जमीनी ह्या शहरालगत महानगरपालिका, एमआयडीसी लगत आहे तसेच काही जमीनी कमर्शियल झोनमध्ये आहेत.
सध्या या जमिनीच्या किंमती अतिशय जास्त म्हणजे बाजारभाव एक ते दीड कोटी किमतीच्या आहेत, परंतु शासन भूसंपादन करतांना रेडीरेकनर दराप्रमाणे करत आहेत, वास्तविक रेडीरेकनर दर अतिशय कमी म्हणजे 4 ते 5 लाख रुपये प्रति एकरी आहे, त्यामुळे एक ते दिड कोटींच्या जमिनी 5 लाखांप्रमाणे कशा द्याव्या हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हे पण वाचा :- 179 Km च्या भूसंपादनासाठी शासनाकडून 2,886 कोटींचा निधी मंजूर, ‘या’ 8 तालुक्यातील 87 गावांतून जाणार..
शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्यामुळे नुकसान होत आहे. बाधीत शेतकऱ्यांना योग्य मावेजा मिळत नसल्याने शेतकरी कृती समितीची आढावा बैठक बाभुळगाव पाटीवर 2 मार्च रोजी आढावा बैठक घेतली. याबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देव्रंद फडणवीस,
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेता अजित पवार, आमदार शामसुंदर शिंदे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकरासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.मोहनराव हंबर्डे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, भूसंपादन अधिकारी विकास माने, तहसीलदार किरण आंबेकर यांना याबाबत निवेदन व प्रत्यक्ष भेट घेतली.
यावेळी बाभुळगाव शिवारात सरण आंदोलन 15 दिवसात करणार असल्याचे दासराव हंबर्डे, अशोकराव मोरे, चांदु कदम, माधवराव कदम, किशोर इंगळे, संतोष मस्के, गजानन हंबर्डे, भगवानराव पोलीस पाटीलसह 12 गावातील बाधीत शेतकरी यांनी सांगितले. यावेळी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.