Maharashtra Cotton price : कापसाच्या दरात मोठी घसरण, आवक वाढताच भाव थेट 7 हजारांवर..! पहा बाजार-समितीतले आजचे बाजारभाव..
दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी राखून ठेवलेले पांढरे सोने आता शेतकऱ्यांनी विक्रीस काढले. बाजारपेठेत कापसाची आवक वाढू लागतात 8500 रुपये या दरम्यान असलेला प्रतिक्विंटल दर शुक्रवार, 4, 5 फेब्रुवारी रोजी 7500 रुपये प्रतिक्विंटलवर आला. प्रतिक्विंटल 1 ते 1,500 रुपयांनी कापसाचा दर खाली आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मागील हंगामात जानेवारी महिन्यात 8 हजार रुपये क्विंटलने शेतकऱ्यांनी कापूस विकला. फेब्रुवारी व मार्च यादरम्यान कापसाचा दर प्रतिक्विंटल 13 हजार रुपयेपर्यंत पोहोचला. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले मागीलवर्षीचा हा अनुभव लक्षात घेता यावर्षी शेतकऱ्यांनी 8 हजार रुपये क्विंटलच्या भावात कापूस न विकता घरीच राखून ठेवला.
किमान 10 हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाल्यावरच कापूस पिकायचा, असा नारा शेतकऱ्यांनी देऊन कापूस उत्पादकांनी एकीचे दर्शन घडविले नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यात कापूस खरेदीला प्रारंभ झाला.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 80 टक्केपेक्षा जास्त कापूस विकला जातो. मोठ्या प्रमाणात कापसावर प्रक्रिया होऊन गाठीची निर्मिती होते. जानेवारी महिन्यात सरकीचा बाजार तेजीत असतो. यावर्षी जानेवारी महिना निघून गेला, पण बाजारपेठेत पाहिजे त्या प्रमाणात कापूस विक्रीस आला नाही. परिणामी अनेक कापूस प्रक्रिया प्रकल्पातील यंत्रसामग्री बंदच आहे.
गेल्या काही दिवसात कापसाचा दर 8500 ते 9000 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता. दर वाढत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी आनंदी झाले. गेल्या तीन दिवसात बाजारपेठेत कापसाची आवक वाढली आणि कापसाच्या दरात घसरण सुरू झाली. शुक्रवार, 4 शनिवारी 5 फेब्रुवारी रोजी कापसाचा दर प्रतिक्विंटल 7 हजार 500 रुपयावर आला.
अचानक झालेली ही घट शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल 1000 रुपये नुकसान करण्यास कारण ठरली. शुक्रवारी काही कापूस प्रक्रिया प्रकल्पांमध्ये 300 ते 400 वाहनांमधून कापूस आला तर काही ठिकाणावर दीडशे ते दोनशे वाहनातून कापूस आल्याचे सांगण्यात येते. हिंगणघाट , आर्वी , वर्धा , सेलू ही कापूस खरेदीची जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे आहेत. येथील कापूस खरेदीचा दर हा 7600 रुपयावर स्थिरावला आहे.
आवक वाढली तर भाव वाढणार नाही..
दरवाढीच्या प्रतीक्षेत गेले दोन महिने घरी राखून ठेवलेले पांढरे सोने आता अचानक मोठ्या प्रमाणात विक्रीस येऊ लागले, तर दरवाढ होणे शक्य नाही. उलट दर कमी होत जातील. यातून शेतकऱ्यांची लूट होईल. व्यापाऱ्यांची घरे भरल्या जातील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.