Cotton Rate: पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना ! हजारो क्विंटल पांढरं सोनं घरातच, शेतकऱ्यांची चिंता वाढली. पहा बाजारभाव..
कापसाचे दर अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने अर्थात कापूस पीक घरातच ठेवण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. प्रतिक्विंटल सात ते आठ हजार रुपयांच्या पलीकडे भाव सरकत नसल्याची वस्तुस्थिती आहे. काही शेतकऱ्यांनी भाव वाढल्यावरच कापूस विकण्याची तयारी दर्शविली आहे.
सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कापसाच्या दरात घसरण झाली या दरात कधी सुधारणा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मागील वर्षी हाच दर 11 ते 12 हजार रुपयांवर होता. मात्र या वर्षी अद्यापही कापसाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच साठवून ठेवण्याची भूमिका घेतली.
मागील वर्षी कापसाला मिळणाऱ्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड वाढविली; परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरले. त्यातच कपाशीवरील रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात घट आली. कपाशीचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.
जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्येदेखील कपाशीची आवक नसल्यागत आहे, परंतु शेतकऱ्यांना लागलेला मजुरीचा खर्च, घरातील लग्नसमारंभाशिवाय मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक असताना कापूस दर कसा वाढेल याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
अतिवृष्टीमुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. एकरी चार ते पाच क्विंटल असे उत्पादन झालं आहे. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कपाशीचे उत्पादन घेतले जाते. मात्र या वर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका कपाशी पिकाला बसला. हाती आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले. उरलेली आशा परतीच्या पावसामुळे मावळली.
या फटक्यातून वाचलेल्या पिकांनादेखील योग्य तो दर मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. कपाशीचे दर कधी वाढणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. यासाठी काही संघटना रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करीत आहे.
मागील वर्षीसारखे भाव मिळतील या आशेने अजूनही शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणला नाही . त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला . त्याचे अर्थचक्र थांबले आहे .
– दिलेश ठाकरे , उपसरपंच व शेतकरी – रामठी
व्यापारी कमी भावात कापसाची खरेदी करीत आहे. जास्त पावसामुळे आधीच शेतपिकाचे नुकसान झाले. कपाशीवर आशा होती. मात्र कापसाचा भाव वाढत नाही तोवर चिंता आहे. कुठवर कापूस ठेवायचा हा प्रश्न आहे.
अरविंद ढोरे, शेतकरी – चांदणी
या वर्षी कपाशीला चांगले भाव मिळतील; परंतु भाव कमी असल्याने निराश आहोत. या भावामुळे शेतीमध्ये लागलेली मजुरी निघत नाही.
– सागर महंत, शेतकरी – नरखेड
पहा बाजारभाव..
श्रीगोंदा बाजार समितीत काल 369 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर हा 8500 पर्यंत मिळाला आहे.
संगमनेर बाजार समितीत काल 10 क्विंटल कापसाची आवक झाली असून जास्तीत जास्त दर हा 8200 पर्यंत मिळाला आहे. राज्यांतील सर्वच बाजार समित्यांबाबत पाहिलं तर 8500 पर्यंत दर स्थिरावला आहे.