खुशखबर ! पांढऱ्या सोन्याला झळाळी..कापूस पोहचला 10 हजारांवर, ‘या’ बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर, पहा बाजारभाव..
सध्या महाराष्ट्रात कापसाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्यात तर नोव्हेंबरच्या 8 दिवसांत राज्यात नवीन कापसासाठी 6 हजार ते 7 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही कापूस साठविण्याचा विचार केला होता.
मात्र, आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस वेचणीलाही विलंब झाला आहे. काही जिल्ह्यांमध्ये नुकतीच कापूस वेचणी सुरू झाली आहे.
त्यामुळेही समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत, कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते.
आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर चढ्या भावाने वाढताना दिसून येत आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी 9 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे आता कापसाची आवक वाढली असून दररोज सुमारे प्रत्येक समितीत 100 वाहनांमधून एक हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येत आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी कें द्रात कापूस खरेदीला महिनाभरापूर्वी सुरूवात करण्यात आली . त्यावेळी लिलावात मुहूर्ताच्या कापसाला 8 हजार 357 रुपये भाव मिळाला होता.
दरम्यान, मध्यंतरी 8 ते 9 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करण्यात आली. मात्र आता कापसाच्या दरात वाढ झाल्याने सुमारे 10 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी कापूस खरेदीला सुरूवात करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 12 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना कापसाचे आणखी वाढतील अशी अपेक्षा कायम आहे.
यामुळे कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक वाढली होती. सुरूवातीला कापसाची सुमारे 50 वाहनांमधून दररोज पाचशे ते सहाशे क्विंटल आवक होत होती. मात्र आता भाववाढ झाल्यानंतर सुमारे 100 हून अधिक वाहनांची आवक होत आहे.
यातून दररोज किमान 1 हजार क्विंटल कापसाची आवक होते आहे. आत्तापर्यंत सुमारे 12 ते 13 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. असे असले तरी कापसाचे दर आणखी वाढतील हि आशा शेतकऱ्यांना कायम आहे. यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी घरात साठविलेला कापूस विक्रीसाठी आणला जात नसल्याचे दिसून येत आहे.
त्यातच ग्रामीण भागातदेखील आता खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी उशिराने आलेला पाऊस, अतिवृष्टी व लाल्या रोग यामुळे कापसाच्या उत्पन्नात घट आली आहे. यामुळे कापसाला सुमारे 12 ते 13 हजार रुपये दर मिळावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.