हवामानाच्या अनिश्चिततेत शेती करणे हे एक नवीन आव्हान बनत चाललं आहे. दिवसेंदिवस बदलत असलेल्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शेतातच पिकांची नासाडी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागतं आहे. या घटनांपासून शेतकरी आणि पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी पीएम पीक विमा योजना (PMFBY) चालवली जात आहे.
यावर्षी अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या मदतीने पिकांचे नुकसान भरून काढता आले आहे. आता महाराष्ट्र सरकारही PMFBY अंतर्गत विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शासनाने मोठा दिलासा दिला असून तब्बल 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1,700 कोटींचा निधी..
पंतप्रधान पीएम पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली असून दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
खरीप हंगाम 2023 मध्ये विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते.
त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे..
कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे पीकविमा रक्कम..
लातूर – शेतकरी लाभार्थी – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)
बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)
धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)
परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)
अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)
जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)
नाशिक – 3, 50,000 हजार (रक्कम – 155.74 कोटी)
सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)
अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)
नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)
सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)
बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)
सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)
जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)
कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)
अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)
एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)