ठाणे – मुंबईकरांना समुद्रातून मिळणार चौथी Lifeline..! लोकल, बेस्ट, मेट्रोनंतर आता वॉटर टॅक्सी, पहा असा असणार रूट..
लोकल ट्रेन नसत्या तर हे शहर कधीच देशाची आर्थिक राजधानी बनले नसते. बेस्टच्या बसेस नसत्या तर मुंबईकर लोकलमधून उतरल्यानंतर वेळेवर ऑफिस किंवा घरी पोहोचले नसते. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या या दोन लाईफ लाईनचा भार वाढला, त्यामुळे मेट्रोचे जाळे सुरू झाले, जे मुंबईकरांसाठी तिसरी लाईफ लाईन म्हणून काम करणार आहे.
सात बेटांना जोडून उभारलेल्या या शहराचे संकट समुद्रातूनच सुटणार असल्याने आता सरकारने चौथ्या लाईफलाइनचे काम सुरू केले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई यांचा समावेश असलेल्या मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) जोडण्यासाठी सरकारने बेलापूर (नवी मुंबई) आणि घोडबंदर (ठाणे) येथे जल टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड वर्षात तयार होणार टर्मिनल..
जलवाहतुकीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने (MMB) ठाणे येथील घोडबंदर रोड आणि नवी मुंबईतील बेलापूर येथे जेट्टी पार्किंग आणि प्रवासी टर्मिनल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दीड वर्षात काम पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे. MMB ने टर्मिनलच्या बांधकामासाठी कंत्राटदाराचा शोध सुरू केला आहे. या दोन्ही ठिकाणी पॅसेंजर टर्मिनल, जेटी पार्किंग आणि इतर सुविधा उभारण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सर्व सुविधा टर्मिनलवरचं..
MMB च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर येथे ग्राउंड प्लस सिंगल – मजली पॅसेंजर टर्मिनल बांधले जाईल. येथे वेटिंग रूम, तिकीट काउंटर, विश्रामगृह असेल. टर्मिनलच्या पहिल्या मजल्यावर कार्यालये असतील. बेलापूर येथील पॅसेंजर टर्मिनल व इतर सुविधांच्या उभारणीसाठी सुमारे 6.09 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कंत्राटदाराला बेलापूर पॅसेंजर टर्मिनलचे बांधकाम 18 महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. बेलापूर येथे यापूर्वीही जेटी बांधण्यात आली आहे, मात्र अन्य सुविधा उपलब्ध न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वर्षभरात तयार होणार ठाणे टर्मिनल..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परिसरातील जेटी आणि पॅसेंजर टर्मिनल इमारत वर्षभरात तयार होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड येथे जेटी पार्किंग आणि टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सुमारे 3.92 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांत ठाण्याचा झपाट्याने विकास झाला आहे. घोडबंदर रोडजवळ राहणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारने नवा पर्याय देण्याची योजना तयार केली आहे.
कसा वाचणार वेळ ?
मुंबईच्या जुन्या वाहतूक व्यवस्थेवरचा भार खूप वाढला आहे. लोकल ट्रेन ही आजही सर्वसामान्यांची पहिली पसंती आहे, मात्र याशिवाय रस्त्याचा विकास करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. ठाण्यातील घोडबंदर रोड असो की मुंबईचे रस्ते, पावसात खड्ड्यांच्या चित्रांनी सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. अशा स्थितीत जलवाहतूक विकसित करणे हाच पर्याय उरतो.
लोकल ट्रेनने ठाणे किंवा बेलापूरला जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो, तर जलमार्गाने हा मार्ग 30 मिनिटांत पूर्ण करता येतो. सध्या बेलापूर ते एलिफंटा अशी वॉटर टॅक्सी धावत असली तरी त्याचा संपूर्ण फायदा इतर ठिकाणी वॉटर टर्मिनल्स विकसित झाल्यावरच मिळणार आहे..