ब्रेकिंग : Agneepath Scheme : सरकारकडून अग्निपथ योजनेत मोठा बदल ; आता ‘या’ वयापर्यंत तरुणांना होता येणार भरती…
महा अपडेट टीम,16 जून 2022 : केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी अग्निपथ योजनेबाबत मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने अग्निपथ योजनेसाठी (Agneepath Scheme) कमाल वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे केली आहे. म्हणजेच भरतीसाठी कमाल वयोमर्यादेत 2 वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, तरुणांना दोन वर्षांच्या सवलतीचा लाभ पहिल्या वर्षीच सेवेच्या कमाल वयात मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे दोन वर्षांपासून सैन्य भरती न झाल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी वयोमर्यादा होती :- 17.30 ते 21
अग्निपथ योजनेची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत केली. ज्याला टूर ऑफ ड्यूटी (Tour of Duty) असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत संरक्षण मंत्रालयाने सैन्य भरतीच्या नियमांमध्ये व्यापक बदल केले आहेत. त्यामुळे योजनेनुसार 4 वर्षांसाठी सैन्यात भरतीची संधी खुली आहे.
तसेच, अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीची वयोमर्यादा संरक्षण मंत्रालयाने 17.5 वरून 21 वर्षे निश्चित केली होती. ज्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी आंशिक बदल केले आणि प्रथमच कमाल वयोमर्यादा 23 वर्षे केली.
गुरुवारी देशातील अनेक शहरांमध्ये झाली निदर्शने :-
केंद्र सरकारने मंगळवारी अग्निपथ योजना जाहीर केली, मात्र गुरुवारी देशातील अनेक शहरांमध्ये युवकांनी या योजनेच्या विरोधात निदर्शने केली. ज्यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडची नावे आघाडीवर होती. बिहारमध्ये तरुणांनी ट्रेनच्या बोगी पेटवताना आग लावली. त्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करावा लागला.
अग्निपथ योजनेवर विरोधकांनीही चढवला हल्लाबोल :-
केंद्राच्या अग्निपथ योजनेवर विरोधक सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेससह एआयएमआयएमने या योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी या योजनेला विरोध केला असून, हा संवेदनशील विषय असून, चर्चेविना ही योजना राबवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या योजनेला विरोध करताना ओवेसी यांनी या योजनेमुळे बेरोजगारी कमी होणार नसून बेरोजगारी वाढणार असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे ही अग्निपथ योजना ?
सरकारने मंगळवारी लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली आहे. दशकांपासून जुन्या सैन्य भरती प्रक्रियेत सुधारणा केली. या योजनेंतर्गत युवकांची 4 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.
या योजनेंतर्गत या वर्षी सुमारे 46,000 तरुणांची तिन्ही सेवांमध्ये भरती करण्यात येणार आहे. निवडीसाठी पात्रता वय पूर्वी 17.5 ते 21 वर्षे दरम्यान होतं, परंतु आता सरकारने कमाल वयोमर्यादा 21 वरून 23 केली आहे. या योजनेंतर्गत भरती होणार्या जवानांना ‘अग्नवीर’ म्हटले जाणार आहे.
सरकारने सुरू केलं जनसंपर्क अभियान :-
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेबाबत जनसंपर्क अभियान सुरू केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अग्निपथ योजनांशी संबंधित तथ्य सार्वजनिक डोमेनमध्ये पोस्ट केले आहेत. त्यात “मिथ वि फॅक्ट्स” नावाचे डिटेल्स पोस्ट केला आहे, यामुळे पसरणारा ‘गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.