महाराष्ट्रातून होणार सत्ता परिवर्तनाला सुरुवात ! शिंदे-फडणवीस युतीला बसणार मोठा धक्का, तर महाविकास आघाडीला..
महाराष्ट्रात सध्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. येत्या काही दिवसांत मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका देखील होऊ घातल्या आहेत. याच दरम्यान, सध्या सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजप यांच्या दृष्टीने एक मोठी बातमी समोर आली आहे.
इंडिया टुडे आणि सी-व्होटर (मूड ऑफ नेशन) यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एनडीएला झटका बसू शकतो. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील शिंदे-भाजप युतीवरही होणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या दोन महत्वाच्या सर्वेक्षणानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे-भाजप युतीचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली आहे. राज्यात आज लोकसभेची निवडणूक झाली, तर यूपीए (महाराष्ट्र) महाविकास आघाडीला ३४ ठिकाणी विजय मिळेल, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. तर एनडीएला केवळ 14 जागा मिळतील. त्याउलट 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात यूपीएला केवळ 5 जागा मिळाल्या होत्या. आणि उर्वरीत जागा एनडीएला मिळाल्या होत्या.
काही महिन्यांपूर्वी राज्यात उफाळून आलेल्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेपासून फारकत घेतली होती. त्यानंतर त्यांच्यासह अन्य 12 खासदारांनीही पक्ष सोडला होता. नंतर मात्र आम्हीच शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजप अधिक सक्रिय आणि आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
यूपीएला 48 पैकी 34 जागा मिळणार ?
तसे पाहायला गेले तर भाजपने राज्यात मिशन 45 ची घोषणा केली होती, परंतु मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात यूपीएला 48 पैकी 34 जागा मिळतील असे म्हटले जात आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला केवळ 14 जागा मिळतील. या सर्वेक्षणामुळे भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. तसेच शिंदे सरकार आणि भाजपमधील तणाव देखील वाढला आहे.
दीड लाख लोकांनी घेतला सहभाग..
या सर्वेक्षणात एकूण एक लाख 40 हजार 917 लोकांनी सहभाग घेतला होता. देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर कोणाचे सरकार येणार, या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणादरम्यान मोदी सरकारबाबतही प्रश्न विचारण्यात आले होते.
सर्वेक्षणामध्ये देशात पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार येणार असे दिसत असले तरी, महाराष्ट्रात मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. मोदी सरकार गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहे आणि 67% लोकांनी त्यांचे काम चांगले असल्याचे म्हटले आहे.
गेल्या निवडणुकीत कोणाला किती जागा ?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांच्यासोबत लढलेल्या शिवसेनेने तब्बल 18 जागा जिंकल्या होत्या. अशा प्रकारे एनडीएने एकूण 41 जागा जिंकल्या होत्या.
मात्र, मूड ऑफ नेशनच्या सर्वेक्षणानुसार यावेळी एनडीए थेट 41 वरून 14 जागांवर घसरणार असल्याचे दिसत आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला एक जागा मिळाली. यावेळीही हा आकडा 34 पर्यंत जाऊ शकतो. कारण यावेळी शिवसेनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असणार आहे.