Varas Nond : वारसनोंदीसाठी आता घरबसल्या करता येणार अर्ज, शासनाकडून दरही निश्चित, पहा अशी आहे ऑनलाईन प्रोसेस..
सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे , बोजा दाखल करणे अथवा कमी करणे तसेच फेरफार विषयक सेवा ऑनलाइन पद्धतीने ई – हक्क प्रणालीद्वारे शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ नागरिकांना महा ई – सेवा केंद्र, सेतू केंद्रातून घेता येत आहे. त्यामुळे या सुविधेसाठी नागरिकांना आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
सातबारा उतारे आता डिजिटल स्वाक्षरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सातबारा उताऱ्यावर फेरफार घेण्याची प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली आहे. अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार म्हणजे सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद करणे,मयताचे नाव कमी करणे बोजा दाखल करणे -अथवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्थांचे नाव बदलणे आदी फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावरील ई – हक्क प्रणालीमध्ये ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे, अशी सुविधा उपलब्ध झाल्याने महत्त्वाच्या दस्ताची कामे सोपी तसेच अचूक होणार आहेत.
महा ई – सेवा केंद्रांसाठी दर निश्चित..
या सुविधेसाठी तसेच सातबारा उतारा आणि आठ ‘अ’ ची प्रत काढणे यासाठी नागरिकांकडून किती दर आकारायचा हे निश्चित नव्हते. अखेर शासनाने या सुविधेसाठी दरनिश्चित केले असून त्यानुसार 25 रुपये असा दरनिश्चित केला आहे.
अर्जाची कागदपत्रे दोनपेक्षा जास्त पाने असेल तर प्रति पान दोन रुपये याप्रमाणे दर आकारावेत, असे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाच्या निर्णयामुळे महा ई – सेवा केंद्र अथवा सेतू केंद्रातून जादा शुल्क आकारण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.