पुणे-बंगळुर ग्रीनफिल्ड हायवे : शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, एकरी 2 कोटी किंवा रेडीरेकनरच्या 10 पट मोबदल्यासाठी ZP कार्यालयावर मोर्चा..
पुणे – बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे हा महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून जाणार आहे. नियोजित महामार्ग हा सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, कोरेगाव, खटाव या चार तालुक्यातील साठ गावांमधून जाणार आहे. त्यासाठीचे मार्किंग केलेले दगड देखील लावण्यात आले आहेत.
मात्र, प्रत्येक गावातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत ग्रीनफिल्ड हायवेचे कसलेही काम कुठल्याही गावच्या हद्दीत सुरू करू देणार नाही तसेच महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वहिवाटीप्रमाणे निवाडा नोटीस द्यावी..
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच मोजणी करण्यापूर्वी चार दिवस अगोदर बाधित शेतकऱ्यांना लिखित स्वरूपात निरोप द्यावा, वहिवाट ठरवण्यासाठी शासकीय कमिटी नेमावी अश्या प्रकारच्या मागण्या मान्य न करता दडपशाहीने महामार्गाचे कसलेही काम सुरू केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.
पुणे – बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्राला खाजगी वाटाघाटीने एकरी दोन कोटी किंवा चालू बाजारभावाच्या दहापट मोबदला मिळावा तसेच या क्षेत्रातील बांधकामे, बोअरवेल, विहिरी, पाईपलाईन, फळझाड, फळबागा यांचे चालू बाजारभावाप्रमाणे योग्य मूल्यांकन करुन त्याच्या चारपट मोबदला मिळावा..
अशाप्रकारच्या विविध मागण्यांसाठी पुणे बंगळुर ग्रीन फिल्ड हायवे बाधित शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले, यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य संघटक भाई दिगंबर कांबळे, जिल्हाध्यक्ष अँड. समीर देसाई, समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे, पंढरीनाथ धुमाळ, सचिन पोळ, विश्वासराव धुमाळ, के. व्ही. अनपट, संदेश धुमाळ यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.